यंदाच्या बाफ्टा (ब्रिटीश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) पुरस्कार सोहळ्यात मणिपुरी भाषेतील ’बूँग’ या चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ गटात बाजी मारून भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत असणारा गुगुन किपगेन हा बालकलाकार स्वतः कुकी-झो समुदायाचा असून त्याने यात मैतेई मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या हरवलेल्या वडिलांना परत आणल्यास आईच्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल, या विश्वासाने तो आपल्या मित्रासह मोरे या सीमावर्ती शहरातून थेट म्यानमारपर्यंतचा प्रवास करतो. एका लहान मुलाच्या नजरेतून दिसणारे जग, त्याचे निरागस प्रश्न आणि वडिलांच्या शोधात त्याला येणारे अनुभव प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतात. – स्वरदा वैद्य, लंडन
लंडन येथील प्रतिष्ठित रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये पार पडलेल्या 79व्या ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अर्थात ‘बाफ्ता’ पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेजगताने एक नवा इतिहास रचला आहे. फरहान अख्तर निर्मित आणि लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित ‘बूंग’ या मणिपुरी चित्रपटाने ’सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट’ (बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म) या श्रेणीत बाफ्ता पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे, या श्र्ेणीत बाफ्ता जिंकणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला असून, जागतिक स्तरावर भारतीय प्रादेशिक सिनेमाची ताकद या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘बूंग’ने डिस्नेच्या ’लिलो अँड स्टिच’ आणि ‘झूटोपिया 2’ सारख्या हॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटांना मागे टाकत हे यश संपादन केले आहे. जेव्हा स्टेजवर लाडक्या ‘पॅडिंग्टन बिअर’च्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तेव्हा तो क्षण केवळ मणिपूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा ठरला.
जागतिक चित्रपटसृष्टीत ‘बाफ्ता’ पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत बाफ्ताकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाते. ब्रिटीश अकादमीकडून दिला जाणारा हा सन्मान केवळ तांत्रिक कौशल्यासाठी नसून, कथेचा आशय आणि त्यातील मानवी संवेदनांच्या प्रभावी मांडणीसाठी दिला जातो. एखाद्या भारतीय चित्रपटाने, त्यातही ईशान्य भारतातील एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाने या व्यासपीठावर स्थान मिळवणे आणि जागतिक दर्जाच्या ॲनिमेटेड व बिग बजेट चित्रपटांना धूळ चारणे, ही बाब भारतीय चित्रपटांच्या बदलत्या प्रवाहाची साक्ष देते. बाफ्तामधील या विजयामुळे भारतीय कथांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यास मोठी मदत होणार आहे.
‘बूंग’ या चित्रपटाचे सर्वात मोठे वेगळेपण म्हणजे त्याची साधी, तरीही काळजाला भिडणारी कथा. मणिपूरमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या ‘बूंग’ नावाच्या मुलाभोवती ही कथा गुंफलेली आहे. ‘बूंग’ या शब्दाचा मणिपुरी भाषेत अर्थ ’छोटा मुलगा’ असा होतो. या मुलाचे वडील रहस्यमयरीत्या गायब झालेले असतात आणि त्याची आई त्याला एकटीने सांभाळत असते. आपल्या आईला जगातील सर्वात मौल्यवान भेटवस्तू द्यायची, या जिद्दीने तो मुलगा आपल्या मित्रासह वडिलांच्या शोधात निघतो. हा शोधप्रवास त्याला मणिपूरच्या डोंगराळ भागातून भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह शहरापर्यंत आणि तिथून थेट म्यानमारमध्ये घेऊन जातो. एका लहान मुलाच्या नजरेतून दिसणारे जग, त्याचे निरागस प्रश्न आणि वडिलांच्या शोधात त्याला येणारे अनुभव प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतात. हा चित्रपट केवळ एका मुलाची गोष्ट नसून, मणिपूरमधील सामाजिक आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणारा एक भावनिक दस्तऐवज आहे.
चित्रपटाच्या यशात त्यातील कलाकारांचा आणि दिग्दर्शिकेचा मोलाचा वाटा आहे. दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांचा हा पहिलाच चित्रपट असून, त्यांनी अतिशय संयतपणे कथेची मांडणी केली आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या गुगुन किपगेन या बालकलाकाराने बूंग ही व्यक्तिरेखा अत्यंत जिवंत केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि वडिलांना शोधण्याची ओढ प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्याच्यासोबत बाला हिजाम, अंगोम सनमतम, विक्रम कोचर आणि नेमिया गांगबम या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ने या चित्रपटाला पाठबळ दिल्याने या कथेला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली. 2024 मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता, तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल जगभरात उत्सुकता होती.
‘बूंग’च्या या विजयाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, जर कलाकृतीमध्ये प्रामाणिकपणा आणि आशयाची ताकद असेल, तर तिला कोणत्याही भौगोलिक सीमा किंवा भाषेचे अडथळे रोखू शकत नाहीत. ईशान्य भारतातील एका दुर्गम भागातील कथा जेव्हा लंडनच्या व्यासपीठावर सन्मानित केली जाते, तेव्हा ती वैश्विक बनते. चित्रपटाची भाषा जरी मणिपुरी असली, तरी त्यातील मुलाचे प्रेम, आईची ओढ आणि कुटुंबाला एकत्र पाहण्याचे स्वप्न या भावना सार्वत्रिक आहेत. चांगल्या सिनेमाला केवळ मोठ्या बजेटची किंवा ग्लॅमरस चेहऱ्यांची गरज नसते, तर मानवी मनाला स्पर्श करणाऱ्या कथानकाची गरज असते, हेच या पुरस्काराने अधोरेखित केले आहे. ईशान्य कडील चित्रपटसृष्टीसाठी हा एक सुवर्णक्षण असून, या यशामुळे आगामी काळात प्रादेशिक चित्रपटांना अधिक प्रोत्साहन मिळेल, यात शंका नाही.
पुरस्कारांची लयलूट
मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू होण्याच्या अवघ्या एक आठवडा आधी चित्रीकरण संपले होते. ‘बूँग’चा जागतिक प्रीमियर 2024 च्या टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. त्यानंतर इफ्फी (गोवा), मामी (मुंबई), वॉर्सा आणि मेलबर्न येथील महोत्सवांमध्येही या चित्रपटाचे कौतुक झाले.बाफ्टा व्यतिरिक्त, कॅनडातील आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात ’उत्कृष्ट चित्रपट’, 17 व्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्डस्मध्ये सर्वोत्कृष्ट युवा चित्रपट आणि मेलबर्नमध्ये गुगुन किपगेन याला सर्वोत्कृष्ट अभिनेता (विशेष उल्लेख) असे पुरस्कार मिळाले आहेत.
मणिपूर चित्रपटसृष्टीची परंरपरा
मणिपूरमधील चित्रपटसृष्टीचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली आणि संघर्षातून उभा राहिलेला आहे. या चित्रपटसृष्टीची अधिकृत सुरुवात 9 एप्रिल 1972 रोजी झाली, जेव्हा देबकुमार बोस दिग्दर्शित ‘मतमगी मणीपूर’ हा पहिला मणिपुरी चित्रपट प्रदर्शित झाला. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आजही 9 एप्रिल हा दिवस ‘मणिपुरी चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या एस. एन. चांद दिग्दर्शित ‘इमागी मगी’ या चित्रपटाने जागतिक स्तरावर मणिपुरी सिनेमाची ओळख निर्माण केली. या चित्रपटाने चित्रपट महोत्सवांमध्ये ग्रांप्री पटकावून मणिपूरच्या मातीतील कथांमध्ये असलेली जागतिक ताकद जगाला दाखवून दिली होती.
नव्वदीच्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आल्यानंतर, तिथल्या स्थानिक चित्रपटसृष्टीने कात टाकली. या काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर स्थानिक भाषेत चित्रपट बनू लागले. अरीबम श्याम शर्मा यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी मणिपुरी सिनेमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्णपदके आणि सन्मान मिळवून दिले. आज ‘बूंग’ सारख्या चित्रपटाने ‘बाफ्ता’मध्ये मिळवलेले यश, हे मणिपूरच्या याच 50 वर्षांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध प्रवासाचे फळ मानले जाते.
—
भारतीय प्रादेशिक चित्रपटांची विश्वभरारी
भारतीय प्रादेशिक चित्रपटांनी जागतिक स्तरावर डंका वाजवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ (बंगाली) या चित्रपटाने जागतिक सिनेमाच्या नकाशावर भारताला मानाचे स्थान मिळवून दिले होते. अलीकडच्या काळात ‘विलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव जगासमोर मांडले होते. तसेच चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘कोर्ट’ आणि ‘द डिसिप्लिन’ या मराठी चित्रपटांनी व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकून मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार रोवला होता.
दुसरे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे मल्याळम चित्रपट ‘2018: एव्हरीवन इज अ हिरो’, ज्याने केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर मानवी संघर्षाची गाथा मांडली होती आणि जागतिक स्तरावर दाद मिळवली होती. तामिळ चित्रपट ‘कूझंगल’ (पेबल्स) याने देखील रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘टायगर अवॉर्ड’ मिळवून प्रादेशिक सिनेमाची ताकद सिद्ध केली होती. ‘बूंग’चा हा विजय याच गौरवशाली परंपरेतील एक पुढचे आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Check Also
रामायण, राम, रणबीर आणि वाद
सध्या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘रामायर्ण या चित्रपटाच्यानिमित्तान रणीबर कपूरने साकारलेल्या रामाच्या व्येितेखेवरुन वाद सुरू आहेत. वास्तविक …
पांचजन्य वृत्तपत्र