हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी अलीकडेच सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल काही धक्कादायक आणि भावूक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीतील यशाच्या शिखरावर राहिलेल्या राजेश खन्ना यांना नंतरच्या काळातील अपयश पचवणं कसं जड गेलं, यावर प्रेम चोप्रा यांनी प्रकाश टाकला. एका संवादादरम्यान प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये जे स्थान आणि लोकप्रियता अनुभवली होती, ती कमी झाल्यावर ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. ते म्हणाले, राजेश खन्ना यांच्यासाठी अपयश स्वीकारणं आणि सर्वोच्च स्थानावरून खाली येणं पचवणं अत्यंत कठीण होतं. यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर वैफल्य (फ्रस्ट्रेशन) निर्माण झालं होतं. कलाकारांच्या मानसिक स्थितीवर भाष्य करताना प्रेम चोप्रा यांनी एक गंभीर निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, जेव्हा कलाकार यशाच्या शिखरावरून खाली येतात, तेव्हा ते एकतर मद्याच्या आहारी जातात किंवा टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवतात. राजेश खन्ना यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आणि या नैराश्यातूनच ते मद्याकडे वळले, असे चोप्रा यांनी नमूद केले. राजेश खन्ना यांनी भारतीय सिनेसृष्टीला सलग 15 सुपरहिट चित्रपट देऊन जो इतिहास रचला होता, तो आजही अबाधित आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आणि नवीन पिढीच्या आगमनानंतर आपली लोकप्रियता ओसरताना पाहणे त्यांच्यासाठी असह्य ठरले होते. प्रेम चोप्रा यांच्या या विधानामुळे चित्रपटसृष्टीतील झगमगाटामागील काळोख आणि कलाकारांच्या मानसिक संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 1970 चे दशक हे केवळ एका कालखंडाचे नाव नसून, ते एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचे प्रतीक आहे. हे दशक अशा एका संघर्षाचे साक्षीदार ठरले, ज्याने भारतीय सिनेसृष्टीतील ‘स्टारडम’ची व्याख्याच मुळापासून बदलून टाकली. एका बाजूला राजेश खन्ना नावाचे असे वादळ होते, ज्याला भारताचा पहिला ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाते, तर दुसऱ्या बाजूला अमिताभ बच्चन नावाचे एक व्यक्तिमत्व उभे राहत होते, ज्याने हळूहळू प्रेक्षकांची आवड बदलली आणि नायकाची पारंपरिक प्रतिमाच मोडीत काढली. 1973 ते 1978 या पाच वर्षांच्या कालावधीत अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपटांनी राजेश खन्ना यांच्या साम्राज्याला मोठे आव्हान दिले आणि हिंदी सिनेसृष्टीत एका नव्या युगाची पहाट झाली.
चित्रपटांचा प्रवाह दर दशकानुसार बदलत असतो आणि सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला हा बदल स्पष्टपणे जाणवू लागला होता. त्यावेळी राजेश खन्ना यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत असा दबदबा होता, जो यापूर्वी कोणत्याही अभिनेत्याला लाभला नव्हता. ’आराधना’, ’आनंद’ आणि ’अमर प्रेम’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना प्रेक्षकांच्या मनाचा सम्राट बनवले होते. त्यांच्या मानेची विशिष्ट ढब, हास्य आणि रोमँटिक अदाकारीने संपूर्ण पिढीला वेड लावले होते. तो काळ असा होता की, नायक म्हणजे संवेदनशील, प्रेमात आकंठ बुडालेला आणि भावनिक गुंतागुंतीमध्ये अडकलेला असावा, असे मानले जायचे. नेमक्या याच काळात अमिताभ बच्चन नावाचा एक तरुण अभिनेता आपला संघर्ष करत होता. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक नकारांना सामोरे जावे लागले. लांब लचक शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि पारंपरिक नायकाचा अभाव यामुळे त्यांचे सुरुवातीचे 10 ते 12 चित्रपट सपशेल फ्लॉप ठरले. मात्र, याच अपयशाने त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता आणि तीव्रता निर्माण केली, जी पुढे जाऊन ’अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेची जननी ठरली.
राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संघर्षाची बीजे ‘आनंद’ चित्रपटातच रोवली गेली होती. जरी त्या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते आणि अमिताभ त्यांच्या सावलीत होते, तरीही प्रेक्षकांना एका नव्या प्रतिभेची जाणीव झाली होती. पुढे 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाने हिंदी सिनेमाची पूर्ण कथाच बदलून टाकली. या चित्रपटात अमिताभ यांनी साकारलेला ‘विजय’ हा पोलीस अधिकारी व्यवस्थेवर नाराज होता, तो अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा होता आणि त्याच्याकडे प्रेमापेक्षा क्रोधाची ताकद जास्त होती. हा विजय म्हणजे तत्कालीन भारतातील बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि सामान्य जनतेमधील असंतोषाचा चेहरा होता. ‘जंजीर’च्या यशानंतर त्याच वर्षी ’नमक हराम’ प्रदर्शित झाला, ज्यात राजेश खन्ना आणि अमिताभ पुन्हा एकदा समोरासमोर आले. जरी राजेश खन्ना त्या चित्रपटाचे मुख्य नायक होते, तरीही अमिताभ यांच्या गंभीर आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेतले. येथूनच सिनेसृष्टीतील यशाची समीकरणे बदलू लागली. ‘अभिमान’ चित्रपटाने दाखवून दिले की अमिताभ केवळ ॲक्शन हिरो नाहीत, तर ते जटिल मानवी भावना समर्थपणे साकारणारे एक उत्तम कलाकार आहेत.
1974 आणि 1975 च्या दरम्यान ‘मजबूर’, ‘बेनाम’ आणि ‘कसौटी’ यांसारख्या चित्रपटांनी अमिताभ यांच्या स्थानाला अधिक बळकटी दिली. मात्र, 1975 हे वर्ष भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ यांचा ‘आज खुश तो बहुत होंगे तुम’ हा संवाद केवळ संवाद राहिला नाही, तर तो त्या काळातील अन्यायाविरुद्धचा आवाज बनला. गरिबी आणि अन्यायाशी लढताना गुन्हेगारी जगाकडे वळणारा तरुण त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला. त्याच वर्षी ’शोले’ प्रदर्शित झाला, ज्याने जागतिक स्तरावर भारतीय सिनेमाची ओळख निर्माण केली. शोलेमधील अमिताभ यांचा ’जय’ शांत आणि गंभीर होता, तरीही त्याची उपस्थिती प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी होती. या चित्रपटाने अमिताभ यांना अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे राजेश खन्ना यांची रोमँटिक जादू आता फिकी पडू लागली होती. सत्तरच्या दशकातील हा बदल केवळ दोन अभिनेत्यांमधील स्पर्धा नव्हती, तर ती भारतीय समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब होती.
1976 आणि 1977 च्या काळात अमिताभ यांनी आपल्या कारकिर्दीला एका वेगळ्याच उंचीवर नेले. ‘दो अनजाने’ मधील सूड, ’हेराफेरी’ मधील विनोद आणि ’अमर अकबर एंथनी’ मधील संपूर्ण मनोरंजन यामुळे ते अष्टपैलू अभिनेते म्हणून सिद्ध झाले. त्याचवेळी ’परवरिश’, ’खून पसीना’ आणि ’अदालत’ या चित्रपटांनी त्यांच्या यशाचा वारू रोखणे अशक्य करून टाकले. याउलट, राजेश खन्ना यांना आपल्या चित्रपटांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यांची रोमँटिक प्रतिमा बदलत्या समाजाला आता जुनी वाटू लागली होती. प्रेक्षकांना आता केवळ फुलांमधील रोमान्स नको होता, तर त्यांना व्यवस्थेशी लढणारा, स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करणारा नायक हवा होता. राजेश खन्ना यांचा पराभव येथेच झाला की त्यांनी काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल केला नाही.
1978 हे वर्ष अमिताभ यांच्या कारकिर्दीचा कळस ठरले. ‘डॉन’ मध्ये त्यांनी साकारलेली दुहेरी भूमिका असो किंवा ’त्रिशूल’ मधील वडिलांना आव्हान देणारा मुलगा असो, अमिताभ यांनी प्रत्येक भूमिकेतून समाजात असलेल्या रागाला वाट करून दिली. ’मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशाने हे सिद्ध केले की आता सिनेसृष्टीचा नवा सुलतान अमिताभ बच्चन आहेत. या चित्रपटातील त्यांच्या पात्राचा दुखांत अंत पाहून प्रेक्षक गहिवरले आणि तो चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला. राजेश खन्ना यांच्या घसरणीचे मुख्य कारण हे होते की ते त्यांच्या जुन्याच प्रतिमेत अडकून राहिले, तर अमिताभ बदलत्या भारताचा नवा आवाज बनले.
अखेर, सत्तरच्या दशकाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांना ’वन मॅन इंडस्ट्री’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तो असा काळ होता जेव्हा संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकाच अभिनेत्याच्या तालावर नाचत होती. हा बदल केवळ स्टारडमचा नव्हता, तर तो समाज, प्रेक्षक आणि सिनेमा यांच्यातील बदलत्या नात्याचा होता. राजेश खन्ना ज्या संवेदनशील आणि रोमँटिक युगाचे प्रतिनिधित्व करत होते, ते युग मागे पडले होते आणि अमिताभ बच्चन यांनी खऱ्या अर्थाने वास्तववादी, विद्रोही आणि संघर्षशील सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली होती. राजेश खन्ना त्या जुन्या सुवर्णकाळाचे प्रतीक म्हणून उरले, जो काळ कधीच विसरता येणार नाही, पण जो काळाच्या प्रवाहात आता मागे सुटला होता. अमिताभ बच्चन यांनी मात्र आपल्या अफाट कौशल्याने आणि काळाच्या ओळखीने सिनेसृष्टीला एक नवीन दिशा दिली, जी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.- सोनम परब
Check Also
‘चांद मेरा दिल’चे पोस्टर रिलीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आगामी ’चांद मेरा दिल’ या चित्रपटाचे नवीन …
पांचजन्य वृत्तपत्र