भारताच्या अवकाश विज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेणार्या डॉ. कृष्णास्वामी कस्तुरीरंगन या विज्ञानयात्रीची प्राणज्योत नुकतीच मालवली. 1994 ते 2003 या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम करताना डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम आत्मनिर्भरतेकडे गेला. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल चं यशस्वी प्रक्षेपण आणि जीसॅट मालिका उपग्रहांच्या माध्यमातून कम्युनिकेशन क्षेत्रातील क्रांती, ही याची ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयआरएस -1 सी आणि आयआरएस 1 डी यांसारखे सारखे विश्वविख्यात रिमोट सेंसिंग उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवण्यात आले. भास्कर-1 आणि 2 या भारताच्या पहिल्या प्रयोगात्मक रिमोट सेंसिंग उपग्रहांचे ते प्रकल्प संचालक होते. याशिवाय इनसॅट -2, आयआरएस पी 3, पी 4 यांसारख्या उपग्रह प्रकल्पांच्या यशस्वी उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. महासागर निरीक्षण उपग्रहांची रचना आणि प्रक्षेपण देखील त्यांनी पाहिलं. या सर्वांच्या साहाय्याने त्यांनी भारताला अंतराळ कार्यक्रमात अग्रगण्य देशांच्या यादीत नेऊन बसवले. तसेच भारतीय अंतराळ विकास कार्यक्रमात मैलाचा दगड मानला जाणार्या ‘चांद्रयान-1’ चे यशस्वी प्रक्षेपण देखील डॉ. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
डॉ. कस्तुरीरंगन यांचं संशोधन उच्च-ऊर्जा क्ष-किरण व गॅमा रे खगोलशास्त्र या विषयांवर केंद्रित होतं. त्यांनी खगोलीय क्ष-किरण स्रोतांचा अभ्यास, गॅमा रे उत्सर्जन आणि क्ष-किरणांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम या विषयांवर 240 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केल्यानंतर, अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबमध्ये 1971 मध्ये ‘एक्सपेरिमेंटल हाई एनर्जी अॅस्ट्रॉनॉमी’ या विषयात डॉक्टरेट मिळवली.
केवळ विज्ञान व तंत्रज्ञानापुरते त्यांचे योगदान मर्यादित नव्हते. भारताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करणार्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी शालेय अभ्यासक्रमांपासून उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षणप्रणालीत मूलभूत बदलांची शिफारस केली. शिक्षणाला मूल्याधारित, कौशल्याधिष्ठित आणि संशोधनप्रधान बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आराखडा आखला. विज्ञान आणि शिक्षण यामधील समन्वय त्यांचं एक वैशिष्ट्य होते. आज नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे ‘विकसित भारत 2047’ या भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा गाभा आहे. पद्मश्री, पद्यभूषण, पद्मविभूषण या तिन्ही सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले होते. फ्रान्स सरकारकडून ‘ऑफिसर ऑफ द लिजियॉन ऑफ ऑनर’ हा विशेष पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने विज्ञानयुगातील एका पर्वाची अखेर झाली आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, विज्ञान-शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे आणि राष्ट्रविकासासाठी दिलेल्या योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील. – प्रा. विजया पंडित
Check Also
दिलासादायक माघार
केंद्र सरकारने बहुचर्चित ‘ऊस (नियंत्रण) आदेश 2026’ चा मसुदा तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. …
पांचजन्य वृत्तपत्र