राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. महाराष्ट्रातील दिघी बंदराचाही यात समावेश करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी केंद्राने राज्याला दिलेली ही भेट मानली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या व मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक समितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या औद्योगिक क्षेत्रांमधील गुंतवणूक 28 हजार 602 कोटी रुपये असेल व या प्रकल्पांमुळे 10 लाख प्रत्यक्ष आणि 30 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. नऊ राज्यांमध्ये पसरलेला आणि सहा प्रमुख कॉरिडोरसह नियोजित असलेला केंद्र सरकारचा हा प्रकल्प देशाच्या उत्पादन क्षमता आणि आर्थिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘महाराष्ट्रातील दिघी बंदराचा हा कॉरिडोर 6 हजार 56 एकर परिसरात उभा राहणार आहे. या विकास प्रकल्पासाठी 5 हजार 469 कोटी रुपये खर्च येणार आहे व यामुळे 1 लाख 14 हजार 183 रोजगार निर्माण होणार आहेत’, अशी माहिती वैष्णव यांची दिली.
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पाशिवाय रेल्वेच्या तीन पायाभूत प्रकल्पांनाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यात जमशेदपूर-पुरुलिया-आसनसोल (121 किमी), ओडिशातील बारगड रोड-नवापारा (138 किमी) व सुंदरगढ जिल्ह्यातील सरदेगा ते रायगड जिल्ह्यातील भालुमुडापर्यंत 37 किमी लांबीचा नवीन दुहेरी मार्ग यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा आणि प्रयागराज, उत्तराखंडमधील खुरपिया, पंजाबातील राजपुरा-पटियाळा, केरळमधील पलक्कड, बिहारमधील गया, तेलंगणाचे झहीराबाद, आंध्र प्रदेशचे ओरवाकल आणि कोपर्थी तसेच राजस्थानातील जोधपूर-पाली येथेही औद्योगिक कॉरिडोर उभे राहणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळाने देशातील 234 शहरे किंवा गावांमध्ये खासगी एफएम रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली. ही सेवा अद्याप या शहरांमध्ये उपलब्ध नव्हती.
मुंबई-गोवा महामार्गवरून श्रीवर्धनकडे वळल्यानंतर दिघीकडे जाता येते. मुंबईहून सुमारे 170 किमी अंतरावर दिघी बंदर वसलेले आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर अंतर्गत हे औद्योगिक क्षेत्र होणार असले तरी यामध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा आणि माणगावमधील जवळपास नऊ गावांचा समावेश होणार आहे. भविष्यात माणगावहून एक रेल्वेमार्ग दिघी औद्योगिक क्षेत्राकडे जाणार आहे. रोहा औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असणारे हे औद्योगिक क्षेत्र रासायनिक आणि स्टील उद्योगाशी संबंधित आहे. दिघी बंदर महाराष्ट्रातील मोठे बंदर असून, मुंबई बंदरापासून सुमारे 42 नॉटिकल मैल अंतरावर आहे. हे अदानी पोर्ट्स आणि एसईझेडद्वारे चालवले जाते. दिघी बंदर तेल, रसायने, कंटेनर आणि मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करण्यासाठी बांधले गेले आहे. या बंदरात प्रचंड क्षमता असलेली बंदिस्त व खुले साठवणूक क्षेत्र आहे. सन 1960पर्यंत या बंदरातून प्रवासी वाहतूकही होत होती. मात्र, औद्योगिकीकरणामुळे अनेक समस्यांच्या गर्तेत हे बंदर सापडले आहे.
Check Also
पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू …
पांचजन्य वृत्तपत्र