अलिकडच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटिलिजन्सने सर्वच क्षेत्रावर व्यापक परिणाम केला आहे. यास मायानगरी देखील अपवाद राहिलेली नाही. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात काळानुसार बदल झाला. पूर्वी चित्रपट तयार करताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत असे. कालांतराने तंत्रज्ञानाच्या विकासामुळे याचा वापर वाढत गेला आणि चित्रपट तयार करणे तुलनेने सोपे राहू लागले. आता तर एआयमुळे चित्रपट निर्मिती ही खूपच सुलभ झाली आहे. चित्रपटाच्या नियोजनापासून ते पटकथा आणि शूटिंगची जागा शोधण्याचेही कामही एआयच्या मदतीने केले जात आहे. पार्श्वसंगीतातही एआयची मोलाची साथ मिळत आहे. साहजिकच हॉलिवूडप्रमाणेच हिंदी चित्रपटांवरही एआयचा परिणाम दिसू लागला आहे.- सोनम परब
————
चित्रपट तयार करण्याचे काम खूपच जिकरीचे आणि कठीण मानले जाते. प्रत्यक्षात ते काम नसुन एकप्रकारचे वेड आहे. एखादा निर्माता या कामाने पछाडलेला असेल तर ते काम पूर्ण होईपर्यंत तो स्वस्थ बसत नाही. चित्रपटाचे यशापयश प्रेक्षकांवर अवलंबून असल्याचे ठाऊक असतानाही तो जीव ओतून चित्रपट तयार करत असतो आणि कलाकृती सादर करत असतो. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात अभिजात निर्मितीसाठी दिग्दर्शक, कलाकार, निर्मात्यांनी घेतलेल्या मेहनतीचे अनेक उदाहरणे सांगता येतील. निर्मितीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी आजारपण बाजूला ठेवत कलाकारांनी कला सादर केली. शिवाय घरातील दागदागिने, घर विकून काहींनी चित्रपट तयार केले आणि त्यांच्या चित्रपटाने इतिहास घडविला आहे. दिग्दर्शक एन.चंद्रा यांचे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांनी ‘अंकुश’ चित्रपटासाठी सर्वस्व पणाला लावले होते. अर्थात काळ बदलत गेला आणि सर्व गोष्टीत आपसूक व्यापक बदल झाले. चित्रपट निर्मितीच्या तंत्रात सुधारणा झाली. परंतु कलेची निर्मिती तंत्रज्ञानापेक्षा बौद्धिक क्षमतेवर अधिक अवलंबून असते. अशावेळी एखाद्या व्यक्तीला अडीच ते तीन तास चित्रपटगृहात खिळवून ठेवणारी कलाकृती तयार करणे ही सामान्य बाब नाही. यासाठी कौशल्य खूपच महत्त्वाचे आहे. कारण तंत्रज्ञानाच्या मार्यामुळे प्रेक्षक आकर्षित होतीलच असे नाही. कारण तिकीटबारीवर गर्दी खेचणणारा चित्रपट हा यशस्वी मानला जातो. या बळावरच राजकपूर, सुभाष गई यासारखे मोठे शोमॅन झाले तर श्याम बेनेगल आणि महेश भट्ट यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड होती. या दिग्दर्शकांच्या बुद्धीत प्रेक्षकांना खुर्चीला बांधून ठेवण्याची क्षमता होती.
आर्टिफिशियल इंटिलिजन्सने उद्योगांत कायापालट केला आणि जेथे शक्यता नव्हती, तेथेही एआयने चमत्कार घडविला. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेतील प्रत्येक पैलूवर या तंत्रज्ञानाचा प्रभाव पडला. संपादन, रिकॉर्डिंग सॉफ्टवेअर, फोर के आणि थ्री डी चित्रपटांपर्यंतच्या कलाकृतीत एआय वापर होत आहे. पटकथा लेखन टूलने देखील निर्मितीवर परिणाम झाला. या माध्यमातून दृश्याचा दर्जा, सादरीकरण, ध्वनी, स्क्रिनिंग इंटरफेस, संपादनाचा स्तर उंचावत असून प्रेक्षकांनाही हा बदल पाहवयास मिळत आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास एआयच्या माध्यमातून उद्योगात नवनवीन प्रयोग होत आहेत. चित्रपट निर्मितीच्या जगासाठी हे एआय टूल क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. एआयमध्ये चित्रपट निर्मिती प्रक्रियेला सामावून घेतले जात असून याप्रमाणे व्यवसाय व्यवस्थापन, कमी खर्च आणि अधिक उत्पन्न यादिशेने वाटचाल होत जात आहे.
हिंदी चित्रपट अधिक प्रभावी
हिंदी चित्रपटाच्या तंत्रज्ञानात दरवर्षी व्यापक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे निर्मार्त्यांबरोबरच प्रेक्षकांच्या विचारातही बदल होत आहे. पण सध्याचा सर्वात ठळकणपणे दिसणारा बदल म्हणजे एआयचा वापर. कथानकापासून ते निर्मितींच्या प्रत्येक पातळीवरएआय दिसून येत आहे. चित्रपट आणि एआय हे समीकरण नव्या युगाची सुरुवात म्हणता येईल. आता तर एआयच्या मदतीने हिंदी चित्रपटांचा दर्जा अत्युच्च शिखर गाठत आहे. प्रामुख्याने पटकथेत त्याचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. पटकथा लेखन अधिक प्रभावी करण्याबरोबरच नवनवीन कथानकही तयार केले जात आहेत. म्हणून आगामी काळात एआयच्या मदतीने तयार केलेली पटकथा प्रेक्षकांना आवडते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता तर एआयच्या मदतीने पात्र विकसित केले जात आहे. काल्पनिक न वाटणारे पण वास्तववादी आणि भारदस्त पात्र साकारण्यास एआयची मदत घेतली जात आहे. अर्थात हॉलिवुडपटात अशा पात्रांची रेलचेल आहे.
पटकथेचे भवितव्य
एआयचा वापर चित्रपटाच्या पटकथा विश्लेषणासाठी देखील केला जावू शकतो. यानुसार संबंधित पटकथा लोकांना आवडेल की नाही आणि बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल, याचेही आकलन होईल. अर्थात अल्गोरिदम भाकित हे अचूक असतेच असे नाही. उदा. वॉर्नर ब्रदर्सने त्यांच्या चित्रपटाचे यश आणि बॉक्स ऑफिसविषयी भाकित करण्यासाठी सिनेलिटिक एआय आधारित प्लॅटफॉर्मची केलेली निवड. 20 वी सेंचुरी फॉक्सने ‘मर्लिन’ प्रणालीचा स्वीकार केला असून ही प्रणाली चित्रपटांचे वैशिष्टये आणि प्रेक्षकांची आवड यात सळमिसळ करण्यासाठी एआय व मशिन लर्निंगचा वापर करते. याचवेळी चित्रपटासाठी प्रोजेक्शनल ग्राफ देखील उपलब्ध करून देते. स्क्रिप्ट बुक देखील एआय आधारित प्रणाली असून ती चित्रपटाबाबत भाकित करत असते. प्री प्रॉडक्शनमध्ये देखील एआयचा वापर केला जात आहे. या मदतीने शेड्यूल तयार करणे, कथेसाठी चांगली जागा पाहणे या गोष्टी करणे शक्य आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामध्ये चित्रपट निर्मितीतील मदत आणि प्री प्रॉडक्शन प्रक्रिया सुलभ करण्याची क्षमता आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने नायकाकडे उपलब्ध तारखेनुसार शूटिंगचे शेडयूल तयार करता येते.
हिंदीतील एआय तंत्रज्ञान
इंग्रजीनंतर हिंदी चित्रपटांत ‘एआय’चा वापर वाढला आहे. गेल्या दीड दशकांत एआयचा परिणाम प्रकर्षाने दिसत आहे. भविष्यात त्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. उदा रोबो (2010) मध्ये एआयचा वापर करत रोबोचे पात्र आणले. रा.वन (2011) चित्रपटात व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर आणि रोबोचे पात्र तयार केले. क्रिश (2013) चित्रपटात एआयचा वापर हा व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सुपरहीरोसाठी करण्यात आला. बाहुबली (2015) चित्रपटात व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अॅनिमेशन तर मिशन मंगल (2019) मध्ये एआयचा वापर व्हिज्युअल इफेक्ट्स आणि स्पेस मिशनचे दृश्य प्रभावीपणे करण्यासाठी केला. विक्रम वेधा (2022) मध्येही एआयचा वापर व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी करण्यात आला.
2.0 मध्ये एआयचा सर्वाधिक वापर
हिंदी चित्रपटात एआयचा सर्वाधिक वापर 2.0 (2018) मध्ये झाला. हा चित्रपट रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटलिजिंन्सवर आधारित होता. यात एआयचा वापर व्हिज्युअल इफेक्ट्स, पात्र तयार करणे तसेच संगीत अणि ध्वनी रचनेसाठी केला. 2.0 चित्रपटात दिग्दर्शक एस. शंकर यांनी अनेक एआय टूल्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. या चित्रपटात फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा देखील वापर केला.रोबोचे पात्र साकारण्याबरोबरच त्याच्या चेहर्यावर जीवंत भाव आणले. तसेच ‘मोशन कॅप्चर’ तंत्रज्ञानाचा देखील वापर केला. यात रोबोच्या पात्राच्या हालचाली अधिक वास्तववादी दाखविल्या. पार्श्वसंगीत आणि ध्वनीरचनेसाठी एआयचा वापर केला आणि तो अधिक प्रभावी ठरला. एकप्रकारे 2.0 हा चित्रपट तिकीटबारीवर यश मिळवून देणारा आणि एआयची क्षमता सांगणारा सिद्ध ठरला.
एकुणातच एआयमुळे हिंदी चित्रपटाला अनेक लाभ मिळत असले तरी अनेक आव्हाने देखील उभी राहत आहेत. पण त्याच्या वापरातून चित्रपट निर्मिती अधिक प्रभावी करता येऊ शकते. त्याचवेळी अचाट कल्पनाशक्ती दाखवताना गुणवत्तेकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष द्यावे लागेल. सध्या एआय प्रारंभिक टप्प्यात आहे. काळानुसार त्याचा वापर वाढेल आणि चित्रपट निर्मिती आणखी सुलभ होईल. एकवेळ अशी येईल की, एकाच खोलीत बसून चित्रपटाची निर्मिती होईल. कारण आतापर्यंत जे अशक्य वाटत होते, ते एआयमुळे साध्य होणार आहे.
Check Also
कलाकारांचा आर्थिक संघर्ष
सिनेअभिनेते राजपाल यादव यांच्या आर्थिक संकटाची चर्चा अलीकडे बराच काळ चालली. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही अनेकांनी …
पांचजन्य वृत्तपत्र