लेख-समिक्षण

चोख प्रत्युत्तराची गरज

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव हा अत्यंत खेदजनक आणि निराशाजनक आहे. आगामी 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता, परंतु पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध खेळण्यास नकार देऊन आपल्या विनाकारण शत्रुत्वाचे दर्शन घडवले आहे. विशेष म्हणजे, या टी-20 विश्वचषकाचे आयोजन सुरुवातीला भारतातच होणार होते, मात्र पाकिस्तानने भारतात येण्यास आक्षेप घेतल्यामुळे श्र्ीलंकेला सह-आयोजक म्हणून समाविष्ट करण्यात आले. पाकिस्तान या स्पर्धेतील आपले सर्व सामने श्र्ीलंकेत खेळणार आहे, मात्र त्याने केवळ भारताविरुद्ध न खेळण्याचा हेका धरला आहे. यामुळे जागतिक क्रिकेट संस्था आयसीसीमध्ये मोठी नाराजी असून आयोजकांचे आर्थिक नुकसान निश्चित मानले जात आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, पाकिस्तान सरकारने हा टोकाचा निर्णय घेण्यामागे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. असे मानले जात आहे की बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानने एका नियोजित रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. या एका पाऊलामुळे केवळ पाकिस्तान क्रिकेट संघाची प्रतिष्ठाच धुळीस मिळणार नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वावरही याचे दूरगामी परिणाम होतील.
पाकिस्तानी क्रिकेटवर आता पूर्णपणे राजकारणाचे सावट पसरले आहे, यात शंका नाही. खरी शोकांतिका अशी की, जो देश दहशतवादाचा पुरस्कार करून आपल्याला त्रास देतो, त्यांच्याशी आपण क्रिकेट खेळू शकत नाही, ही भूमिका भारतातून नेहमीच मांडली जाते. याच कारणामुळे भारतीय संघ 2008 पासून कधीही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेटचे अपरिमित नुकसान झाले आहे, तरीही तिथले राज्यकर्तेही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आपल्या खर्चासाठी जागतिक क्रिकेटवर अवलंबून आहे आणि जागतिक क्रिकेटमधील 80 टक्क्यांहून अधिक पैसा हा भारतीय आहे. भारताच्या आर्थिक योगदानावर जागतिक क्रिकेट चालते, हे मान्य करणे पाकिस्तानच्या कट्टर राजकारणाला जड जात आहे. पाकिस्तानने आशिया चषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला चषक न सोपवून आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन यापूर्वीच घडवले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची जगभरात मोठी मागणी असते. अशा सामन्यांच्या प्रसारणावेळी अवघ्या 10 सेकंदांच्या जाहिरातीची किंमत 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. आता वेळ आली आहे की भारतीय क्रिकेट बोर्डाने केवळ उत्पन्नाचा विचार न करता आपल्या सन्मानाचीही काळजी करावी. जर भारत क्रिकेटची महाशक्ती आहे, तर ते सत्य जगासमोर ठामपणे मांडले पाहिजे. भारतीय क्रिकेट प्रेमींच्या भावनांशी होणारी ही खेळ थांबायला हवी. बांगलादेश आणि आता पाकिस्तानने जागतिक क्रिकेटला ज्या प्रकारे धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची भरपाई होणे आवश्यक आहे. भारताने नेहमीच खिलाडूवृत्ती दाखवून पाकिस्तानसोबत खेळण्याचे मार्ग काढले आहेत, परंतु पाकिस्तानने ज्या पद्धतीने याला उत्तर दिले आहे, त्याला चोख प्रत्युत्तर देणे आता अनिवार्य झाले आहे.
या निर्णयामुळे साधारण 4500 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कंगाल होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास त्याचा मोठा फटका जागतिक क्रिकेटच्या आर्थिक गणिताला बसणार आहे. या कृतीमुळे खेळाच्या मूळ भावनेलाही धक्का लागला आहे, कारण अशा स्पर्धा राष्ट्रांमधील एकता, शांतता आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याचे माध्यम असतात. त्यामुळे खेळाला भू-राजकीय तणाव आणि राजकारणापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

Check Also

वाढते विमान अपघात आणि प्रशिक्षण संस्था

देशातील हवाई क्षेत्राला सध्या एकामागून एक घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. आसाममध्ये झालेल्या …